गेल्या दोन वर्षांमध्ये शेअर मार्केटमध्ये नविन रिटेल ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्सची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली दुय्यम उत्पन्नाची गरज व लॉकडाऊन हे या वाढीमागचे प्रमुख कारण आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये सुमारे 11600 वर असलेला निफ्टी एका महिन्यामध्ये 7500 पर्यंत कोसळला. याच सुमारास सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे लोकांकडे बराच रिकामा वेळ होता आणी त्याचबरोबर काहेतरी नविन करण्याची एक प्रचंड मोठी गरज व उर्मी होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी आपली डीमॅट अकाऊंट्स सुरु करुन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक व ट्रेडिंग करणे सुरु केले. मार्च 2020 अखेरीस बाजारामध्ये रिकव्हरी सुरु झाली आणि सुरु झाला तेजीचा महाभयानक प्रकोप! 7500 पर्यंत तुटलेला बाजार वाढत वाढत ऑक्टोबर 2021 मध्ये 18600 च्या पातळीवर जाऊन पोहोचला. यामुळे खूप लोकांना फार मोठे फायदे या शेअर बाजारामधून मिळवता आले.
या सर्व तेजीमुळे आणि झालेल्या फायद्यामुळे नविन गुंतवणूकदाराच्या मनामध्ये एक बेफिकिरीची भावना निर्माण होऊ लागते. गेली दोन वर्षे म्हणजे मिडास राजाच्या गोष्टीप्रमाणे "हात लावीन त्याचे सोने होईल" अश्या प्रकारची गेलेली आहेत. परंतु गेल्या शेकडो वर्षांचा आंतरराष्ट्रीय बाजारांचा व गेल्या काही दशकांचा भारतीय बाजाराचा बारकाईने अभ्यास केल्यास आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे शेअर बाजार हा "सायकल्स"मध्ये चालत असतो. या बाजारामध्ये तेजीच्या सायकल्स असतात तश्याच मंदीच्या सायकल्सदेखील असतात. आणि तेजी झाली की मंदी झालीच पाहिजे आणि मंदी झाली की तेजी झालीच पाहिजे हे बाजाराचे तत्व आहे.
भारतीय शेअर बाजारामधील तेजीच्या सायकल्सची काही वर्षे
- 1991 ते 1992
- 1993 ते 1994
- 1998 ते 2000
- 2003 ते 2008 (महा तेजी)
- 2009 ते 2020 (दीर्घ पल्ल्याची महा तेजी)
- 2020 ते चालू (महा तेजी)
तसेच शेअर बाजाराने मंदीच्या सायकल्सदेखील बरेचदा बघितल्या.
भारतीय शेअर बाजारामधील मंदीच्या सायकल्सची काही वर्षे
- 1992 ते 1993
- 1994 ते 1998 (संथ मंदी)
- 2000 ते 2003 (गंभीर मंदी)
- 2008 ते 2009 (वर्षानुवर्षांची कमाई धुवून टाकणारी मंदी)
- 2020 (करोनामुळे आलेली मिनी मंदी)
या सर्व मंदीच्या सायकल्समध्ये 2008 मध्ये आलेली मंदी ही सर्वात भयानक होती. कारण यामध्ये लोकांचे वर्षानुवर्षे मिळालेले प्रॉफिट्स क्षणात होत्याचे नव्हते झाले. अमेरिकेत उद्भवलेल्या लेहमन ब्रदर्स आणि सबप्राईम समस्येमुळे जगभरामध्ये ही मंदी आलेली होती.
हे सर्व आकडे तुमच्यासमोर देण्याची दोन प्रमुख कारणे आहेत -
1 - बाजारामध्ये तेजी येते तशीच मंदीदेखील येते याची तुम्हाला जाणीव करुन देणे
2 - भविष्यामध्ये येऊ शकणार्या मंदीला हाताळण्याकरिता योग्य मानसिकता तुमच्यामध्ये तयार करणे
या लेखाचे शीर्षक - "असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा" असे मुद्दाम दिलेले आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये वर उल्लेख केल्याप्रमाणे बर्याच यशस्वी गुंतवणूकदारांच्या मनामध्ये एक बेफिकिरीची भावना निर्माण झालेली आहे. परंतु ही भावना व्यवसायामध्ये अत्यंत घातक ठरत असते. गुंतवणूक किंवा ट्रेडिंग याकडे एक व्यवसाय या अर्थानेच बघितले पाहिजे. त्यामुळे चलाख व्यावसायिक जसा कायम सजग असतो त्याचप्रमाणे आपणदेखील बाजारामध्ये सजग राहिले पाहिजे. मंदी ही सर्दीच्या रोगाप्रमाणे आहे. आपल्याला सर्दी होणार असते तेव्हा त्याची पूर्वसूचना आपल्याला कायम मिळत असते बघा. आपले नाक खाजू लागते, घसा खवखवतो, बोलताना आवाजामध्ये एक सूक्ष्म बदल घडू लागतो आणि आपल्याला समजते की आता काही काळात आपल्याला सर्दी होणार. तसेच मंदीदेखील येताना पूर्वसूचना देत असते. आपल्याला शेअर्सच्या चार्ट्सवरील इंडिकेटर्समध्ये मंदीच्या सूचना दिसू लागतात. फॉरेनचे गुंतवणूकदार आपापले पैसे बाजारामधून काढून घेऊ लागतात. ट्रेंड फॉलोविंग इंडिकेटर्समध्ये निगेटिव्ह क्रॉसओव्हर्स दिसू लागतात. अश्या बर्याच सूचना मंदी आपल्याला येण्यापूर्वी देत असते. या सर्व सूचना आपण वाचल्या पाहिजेत. आणि मंदीची चाहूल लागताच आपण सजग राहून जमेल तसे प्रॉफिट बूकिंग किंवा पोर्टफोलिओ हेजिंग करुन स्वतःला सुरक्षित केले पाहिजे. हे सर्व वाचण्यासाठी अवघड वाटत असले तरी शिकण्यासाठी अत्यंत सोपे आहे आणि सर्वसामान्य कोणीही व्यक्ती हे आत्मसात करुन घेऊ शकतो.
तसेच आपली सर्व गुंतवणूक ही शेअर बाजारामध्ये न ठेवता त्याचे विविध ठिकाणी विभाजन करुन ठेवली गेली पाहिजे. तसेच आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी काही रक्कम ही सदैव तयार ठेवली पाहिजे. गुंतवणूकदार हा राजा असतो. व त्याचा पैसा हे त्याचे सैन्य असते. राजा हा स्वतःकडील सर्व सैन्य एकाच लढाईवर कधीच पाठवित नसतो. तसेच काही शिपाई कायम राजाच्या सुरक्षिततेसाठी तैनात ठेवलेले असतात. आपल्या पैश्यांच्या बाबतीत हेच धोरण जर राबवले तर आपल्यावर "असेल तेव्हा दिवाळी अन् नसेल तेव्हा शिमगा" अशी वेळ कधीच येणार नाही!
शेअर मार्केटमध्ये व म्युच्युअल फंडांमध्ये यशस्वी काम करणे अतिशय सोपे आहे. हे करण्यासाठी असंख्य वेगवेगळ्या पद्धती व स्ट्रॅटेजीज् असतात. आपल्याला जर शेअर बाजारामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण या पद्धती व्यवस्थित शिकून घेतल्या पाहिजेत. गुंतवणूक कट्टा या उपक्रमाद्वारे तुम्हाला अश्या विविध पद्धती शिकण्याची संधी मिळते.
वरील माहिती हा कोणत्याही स्वरुपाचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणताही आर्थिक निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घ्यावा.
